Friday 8 April 2016

काय म्हणाल्या विद्द्या बाळ ?
शनी शिंगणापूर प्रकरणी विद्द्या बाळ यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेतील त्यांचे मनोगत वाचकांसाठी देत आहे...  
  




     शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना  मिळालेला प्रवेश माझ्यासाठी आनंदाचा विषय असली तरीही हा निर्मळ आणि निर्भेळ आनंद नाही. महिलांचा ऐतिहासिक लढा आणि न्यायालयाचा निर्णय यांचा हा एकत्रित परिणाम आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेला समतेचा मूलमंत्र घेऊन आम्ही सनदशीर मार्गाने मंदिर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, भारतीय राज्यघटना व न्यायालयाने दिलेल्या निर्णायाचा अवमान करीत महिलांना मंदिर प्रवेश देण्यात येत नव्हता. उलट त्यासाठी विरोध करणाऱ्यांनाच सरकार व पोलिसांनी संरक्षण दिले. शनी शिंगणापूर मंदिर प्रशासनानेही महिलांना प्रवेश द्यावा लागेल म्हणूण पुरुषांनाही चाबुतऱ्यावर प्रवेश नाकारला होता. मात्र, पाडव्याच्या दिवशी पुरुषांच्या समुहाने बळजबरीने शनी चबुतऱ्यावर प्रवेश केला. त्यातूनच भीतीपोटी आता महिलानाही प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना मिळत
असलेला हा मंदिर प्रवेश मात्र घटनेला अभिप्रेत असलेल्या समता तत्वाचे पालन करणारा नाही. मुळात समता आणि भेदभावाच्या पलीकडचे वातावरण निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. मात्र, या बाबतीत जंगल कायदा वापरत ‘बळी तो कान पीडी’ हे सूत्र अमलात आणले गेले. मुळात घुसखोरी करून  अमलात आणलेला कायदा ही घटनेला अभिप्रेत असलेल्या तत्वांची सकारात्मक अमलबजावणी नाही. त्यातून कायद्याच्या मुळ उद्देशावरच गदा येते. घटनेची पायमल्ली करीत परंपराचा प्रमाण मानणाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा मंदिर प्रवेश म्हणजे कायद्याचा संपूर्ण विजय झाला असे नाही उलट पोलीस आणि सरकारनेच गुन्हेगारांना कायदा मोडण्यास सहकार्य केले असल्याने त्यांनीच घटनाभांग केला आहे. त्यासाठी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात यायला हवे. 


लढ्याची पार्श्वभूमी 
शनी शिंगणापूर मंदिर प्रवेशाचा मुद्दा अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या चळवळीचा एक भाग होता. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुढाकाराने २००० साली यासाठी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी अहमदनगर येथे सत्याग्रहही करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्रीराम लागू, पुष्पा भावे आदींनी व्यापक लढा निर्माण केला होता. त्यावेळी त्यांना अटकही करण्यात आली होती. 

चळवळीची भूमिका 
कोणत्याही चळवळीला वैचारिक पाया असणे महत्वाचे असते. मी नास्तिक आहे. मग मला मंदिर प्रवेशाशी काय कर्तव्य असा नेहमी प्रश्न विचारण्यात येतो. मात्र, इथे प्रश्न आहे तो समतेचा. 

                                                  



                                                     -विद्या बाळ यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांनी व्यक्त केलेले मनोगत


  

No comments:

Post a Comment