Sunday 21 June 2015

मा.शरद पवार : एक आकलन 



प्रस्तावना- 
         पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्याकारणात ज्या थोडक्या नेत्यांनी आपल्या कार्य कौशल्याने जनमनावर राज्य केले त्याच परंपरेत एक नाव घेतलं जात ते म्हणजे  शरद पवार यांचे होय.जानता राजा ही उपाधीही त्यांना जनतेने त्यांना मोठ्या उस्फुर्तपणे बहाल केली.पवारांच्या जीवनाचा अभ्यास केल्या शिवाय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास अपुराच ठरावा एवढे हे नाव आपल्या व्यक्तित्वाने त्यांनी अधोरेखित केले आहे.मात्र शरद पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केवळ एकाच अंगाने विचार करून चालणार नाही.काहीही झाले तरी महाराष्ट्र आणि देशातील बुद्धिवादी मंडळी मात्र 'शरद चांदणे दुरुनी साजरे' असे म्हणत असतील तर याचा निश्चितच याचा विचार झाला पाहिजे. एके काळी शरद पवार म्हणजेच महाराष्ट्र हेच एक समीकरण होऊन बसले होते मात्र आज तसे नाही. काळ बदलतो तशीच एखाद्या व्यक्तित्वाची होत असलेली पूजा या संदर्भत लोक सारासार विचार लोक करू लागतात. महाराष्ट्राचे केवळ आणि केवळ शरद पवार हेच भवितव्य हा भाव आता जरी मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरीही पवार साहेबांचे मोठ्या प्रमाणात समर्थक मंडळी महाराष्ट्रात आहेत. समकालीन संदर्भात जरीही पवारांचे स्थान राजकीय वर्तुळात थोडे मागे-पुढे होत असले तरीही आपल्या मुस्सदी  भूमिकांमधून आपले आणि आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी जपले आहे.एखाद्या माणसाच्या जीवनात एकीकडे प्रचंड मोठा समर्थक वर्ग आणि मानसन्मान,सत्ता तर दुसरीकडे अनेकानेक आरोप आणि विरोधक हे कॉकटेल मला तरी आज आकलनाच्या पलीकडले वाटते.तरीही एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवन आणि कार्याचा घेतलेला हा एक आढावा…

शरद पवार : जीवन आणि कार्य-
पवार साहेबांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.आपल्या कडे एक म्हण प्रचलित आहे 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' याच न्यायाने १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला.कदाचित येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली असे आपणास म्हणता येईल. त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेतृत्वाही त्यांनी केले.एकदा विद्यार्थी संघटनेच्याच एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.याच दरम्यान पवार साहेबांना यशवंतरावांचे मार्गदर्शन लाभले.त्याचाच परिणाम म्हणून वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.पुढे १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यव्रुत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.पवारांची ही जडण-घडण त्यांच्या भावी आयुष्यासाठी महत्वाची ठरली. 
मा.साहेबांशी संवाद साधण्याची संधी दिल्ली अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मिळाली.

शरद पवार आणि महाराष्ट्र विधानसभा-
तारुण्य आणि ऐन उमेदीच्या काळात वयाच्या २७ व्या वर्षी  इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले.श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले.इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे ही पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली..

पवार एक मुख्यमंत्री
१८ जुलै१९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली.त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

लोकसभा
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी आपले स्थान बळकट केले होते.पुढे १९८४ साली लोकसभा निवडणुक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले .मार्च १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि साहेब राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
         इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
       नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.
      पुढे राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या.राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.परंतू जानेवारी १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
       १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.नरसिहरावांनी पवारांना केंद्रिय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून १९९१ रोजी त्यांचा केंद्रिय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याजागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.मात्र राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. 
    नरसिहरावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सुत्रे स्वीकारली.

पुन्हा एकदा मुख्यमंत्री : वादांची वादळे-
केंद्रातून पुंन्हा एकदा महाराष्ट्रात येउन चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची कारकीर्द त्यांनी सुरु केली,मात्रभविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे मात्र त्यांच्या ध्यानी मनी ही नव्हते. पवारांच्या शपथविधीला एक आठवडा व्हायच्या आतच १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले.त्यात २५७ लोक ठार तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले.या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले.तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालत आहे असा आरोप झाला.जळगाव येथील सेक्स स्कँडल मध्ये अनेक तरूणींवर लैंगिक अत्याचार झाले.त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.
     राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या.त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली.अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरूध्द अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.जनतेत सरकारविरूध्द वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले.काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च १९९५ रोजी शपथविधी झाला.

पुन्हा एकदा चलो दिल्ली
          १९९६ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले.जून १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली पण त्यांचा पराभव झाला.१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

मात्र १२ वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९ मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की,१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,"उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणतीही व्यक्ती सरकारचे नेत्रुत्व करणे योग्य होणार नाही.कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडीत आहे"'त्या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार,पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.

शरद पवार आणि राष्ट्रवादी
      पक्षाने केलेल्या कार्यवाही नंतर मात्र त्यांनी १० जून १९९९ रोजी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली.१९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली.राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. जुलै २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली आहे.१ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.शरद पवार  जीवनाचा हा धावता आढावा पण एखाद्या व्यक्तित्वाचा अभ्यास करतांना बाजू नाही तर पैलूही शोधावे लागतील.आरोप-प्रत्त्यारोपांच्या  आणि मान-सन्मान,पद,सत्ता व प्रतिष्टेच्या व्युहात एखाद्या व्यक्तीला आपले निच्चीत असे स्थान समाजमनासमोर निर्माण करणे यासाठी जी तपस्या लागते त्यापलीकडे जाऊन मोठी मानस राबतात मग विचारधारा,जाणीवां,स्वार्थ,राजकारण,सेवा यानाही शोधन महत्वाच ठरत. 

# sharadpawar  #nationalistcongressparty
(सम्पूर्णतः संकलित लेख.संदर्भ-विकिपीडिया)