Friday 13 May 2016

मक्ता तुमचाच का ?
भारतातील पहल्या महिला रायडर ईशा गुप्ता यांची अनोखी सफर   

  
             "महिलांसाठी असुरक्षित देश अशीच आपल्या देशाचे चित्रण सर्वत्र केले जाते. माझ्या प्रवासात मात्र मला तसे अनुभव आले नाहीत. सर्वांना मुक्तपणे जगण्याचा अधिकार देशात असताना महिलाही त्याला अपवाद ठरू शकत नाहीत, हे दाखवून देण्यासाठीच मी भटकत आहे." 

-ईशा गुप्ता, बाईक रायडर 

 
  


        पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या बाईक रायडिंग या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करीत देशातील पहिली महिला रायडर होण्याचा सन्मान पटकाविला आहे ईशा गुप्ता या तरुणीने. ११० दिवसांत १७ राज्यांचा प्रवास करण्याचे ध्येय बाळगत वैयक्तिक रायडिंगच्या क्षेत्रात नवा विक्रम गाठण्याचे स्वप्न ईशाने उराशी बाळगले आहे. 


   
   रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनातून मुक्तपणे भटकण्याचा निर्धार करीत २६ जानेवारी २०१६ रोजी तिने बंगरूळहून आपला प्रवास सुरू केला. अनुभवांचे ओझे घेऊन तिचा हा प्रवास अजूनही सुरू आहे तो बाईक रायडिंगच्या क्षेत्रात नवा विक्रम गाठण्यासाठीच. आतापर्यंत ६९ दिवसांत २१ हजार १२३ किलोमीटरचा प्रवास करीत ईशा पुण्यात आली होती. त्यानिमित्ताने तिने आपल्या अनोख्या प्रवासातील अनुभव सांगितले.


   
      वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना आणि त्यातच भारत म्हणजे महिलांसाठी सर्वांत असुरक्षित देश, अशी बाह्य जगाची धारणा होत असतानाच याला विरोध करण्यासाठीच आपण हे धाडस करू शकलो, अशी प्रतिक्रिया या वेळी ईशाने व्यक्त केली. मुळात ‘सीबीआरई’ या नामांकित संस्थेत सीनियर मॅनेजर या पदावर कार्यरत असणारी ईशा ही मूळची बंगरूळची. पण, हल्ली मुक्काम मात्र लखनौ येथे असून, आई केरळची असल्याने ती मात्र कोणत्याही राज्यापेक्षा स्वतःला पूर्ण भारतीय मानते. याचा भारतीयत्वाचा अभिमान बाळगत ‘उत्सव भारतीयत्वाचा’ ही अभिनव ‘थीम’ घेऊन तिने आपला रायडिंगचा प्रवास सुरू केला. प्रवासात आलेल्या अनेक अडचणींवर मात करीत तिने एक अभिमानाचा टप्पा पूर्ण करीत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात स्वतःची वेगळी मोहोर उमटविली आहे.



        मुळात ‘बाईक रायडिंग’चे कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेल्या ईशाने याआधीही सुमारे ७ काजार किलोमीटर लांबीचा प्रवास फक्त ४० दिवसांत पूर्ण करीत २० मेट्रो शहरांना भेटी दिल्या होत्या. मात्र, हा प्रवास केवळ महामार्गांवरील असल्याने फारशा अडचणी आल्या नसल्याचे ती सांगते. या वेळचा संपूर्ण प्रवास मात्र सर्वार्थाने वेगळा ठरला असल्याचे सांगत शहरे आणि गावांपासून ते जंगल असलेल्या भागातून अनेक अडचणी आल्याचे ती सांगते. मात्र, या अनुभवामधूनही खूप काही शिकायला मिळाल्याने भावी जीवनाची शिदोरी यानिमित्त बांधता आल्याची भावनाही तिच्या मनात आहे.

कसे आहे प्रवासाचे नियोजन...

   दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि गाडीला लागणारी साधने घेऊन तिचा रोजचा प्रवास सुरू होतो. दररोज ३५० ते ४०० किलोमीटरचा टप्पा गाठण्याचे तिचे ध्येय असते. मात्र, जसे आपण एखाद्या प्रवासाचे वेळापत्रक आखतो तसे न आखता मनासारखा भटकणारा प्रवास करण्यातच खरी मजा असल्याचे ईशा सांगते. या प्रवासात कधी मित्रांकडे, कधी हॉटेलमध्ये तर कधी एखाद्या मंदिरात मुक्काम करीत देशाची विविधता जाणून घेण्याबरोबरच आपण सारे एकच आहोत, हा संदेश देण्यासाठी आपला प्रवास असल्याची भावना ईशा व्यक्त करते.

Sunday 8 May 2016

प्रल्हादजी छाब्रिया : अ सेल्फमेड मॅन
फिनोलेक्स उद्द्योग समूहाचे संस्थापक प्रल्हादजी छाब्रिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली 



        देशाच्या फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात येत मातृभूमीच्या हितासाठी कष्ट सोसत, सामाजिक भावनेतून उद्योगविश्वाची उभारणी करीत नवा आदर्श निर्माण करणाऱ्या उद्योगमहर्षी प्रल्हाद छाब्रिया यांचे दि. ५ मे रोजी पुण्यात निधन झाले. समाजाची जाण असलेला उद्योगरत्न आपण गमाविला. पण, त्यांच्या चिरंतन स्मृती मात्र सतत भारतीयांना नवी प्रेरणा देत राहतील. अशा द्रष्ट्या उद्योजकाला शब्दरूपी पुष्पांजली...

     
   देशाची फाळणी झाल्यानंतर राष्ट्र उभारणी करण्याची मोठी जबाबदारी भारतीयांवर होती. मात्र, त्यात आपले सर्वस्व गमाविलेल्या निर्वासितांची भूमिकाही तितकीच मोलाची म्हणावी लागेल. न डगमगता येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जात स्वतःला सावरत मातृभूमीसाठी झटणारी माणसे त्या काळात सुदैवाने आपल्याला लाभली; म्हणूनच आज देशाचा प्रवास महासात्तेकडे होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. याच विविधांगी क्षेत्रात राष्ट्रनिर्मात्यांच्या परंपरेत प्रल्हाद छाब्रिया यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. प्रल्हादजी यांचा जन्म १९३० सालचा. आजच्या पाकिस्तानातील कराची शहरात त्यांचे बालपण गेले. मात्र, सर्व सामान्यांना लाभणारे बालपण काही त्यांना उपभोगता आले नाही. प्रल्हादजींच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मात्र घरातल्या कर्त्या पुरुषाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अगदी उमलत्या वयातच परिवाराच्या भरणपोषणाची जबाबदारी आल्याने त्यांना केवळ १० रुपये महिना पगाराची नोकरी धरावी लागली. मात्र, जबाबदारीच्या जाणिवेतून नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. पुढे १९४७ च्या काळात मात्र देशाला फाळणीच्या संकटातून जावे लागले. यातच छाब्रिया कुटुंबाला कराची सोडून स्वतःच्या देशात येण्यासाठी धडपडणे महत्त्वाचे झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसतानाही केलेले हे स्थलांतर मात्र जणू नव्या काळाची नांदीच होती. कराचीवरून अमृतसर आणि पुढे हितचिंतकांच्या सांगण्यावरून त्यांनी पुण्याचा मार्ग धरला.




       पुण्यात प्रल्हादजींना ३० रुपये पगाराची नोकरी मिळणार होती. मात्र, स्वभावातच उद्यमशीलता असलेल्या प्रल्हादजींना काही नवीन करण्याची वृत्ती स्वस्त बसू देत नव्हती. अर्थात, केवळ नोकरी करून पोट भरण्यात त्यांचे मन रमले नाही. पुण्यातल्या चांगल्या नोकरीला नाकारत त्यांनी उद्योगाची कास धरली. त्यातूनच नवे मार्ग निर्माण करण्याची धडाडी वृत्ती इतरांनाही स्वतःबरोबर घेत जोमाने कार्य करण्यासाठी उद्युक्त करणारी ठरली. पुण्याच्या बुधवार पेठ भागातून त्यांनी आपल्या व्यवसायास सुरुवात करीत प्रसंगी सायकलवरही विविध जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याचा उद्योग त्यांनी आरंभला.

   महाराष्ट्राच्या इतिहासात १९६०चे दशक महत्त्वाचे ठरते ते उद्योगविश्वाच्या उदयाच्या निमित्ताने. याच काळात प्रल्हाद छाब्रिया हे अमराठी नावही मराठी उद्योगविश्वात तितक्याच आत्मीयतेने पुढे आले. ‘फिनोलेक्स’ उद्योगसमूहाची स्थापना करीत देशात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबलची निर्मिती करण्याचा मान त्यांनी पटकाविला. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात कृषी क्षेत्रात क्रांतिकारक ठरलेली ठिबक सिंचन प्रणाली निर्माण करीत ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे राष्ट्र उभारणीच्या कार्यातील आदर्शच म्हणावा लागेल.

  आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत ‘कधी न संपे माउलीची वारी, फिनोलेक्स देई पाण्याची अखंड धारी’ हे ब्रीदवाक्य फिनोलेक्स उद्योगसमूहाच्या सिंचन क्षेत्रातील योगदानाचीच जणू साक्ष देते. सतत उद्योगी राहत आपण करीत असलेल्या कामाशी निष्ठा बाळगत उत्पादनाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता प्रल्हादजींनी ‘तयाचा वेलू गगनावरी’ नेला. त्यातूनच केवळ ५० रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या फिनोलेक्स उद्योगसमूहाची १० हजार कोटी रुपयांची उलाढाल यशस्वी करीत देशातच नव्हे, तर अांतरराष्ट्रीय स्तरावर कार्यकर्तृत्वाची मोहोर त्यांनी उमटविली.


      जगातील काही प्रगत देशांनाही फिनोलेक्सबरोबर करार करणे महत्त्वाचे ठरू लागले. प्रल्हादजींच्या कष्टाला मिळालेली ही पावतीच म्हणावी लागेल. हलाकीच्या परिस्थितीतून वर येऊन आर्थिक साम्राज्याचा डोलारा निर्माण करणारे महाभाग समाजात काही कमी नाहीत. मात्र, स्वतःबरोबरच इतरांना आधार देणारे हात दुर्दैवाने कमी आहेत. प्रल्हादजींनी मात्र आकाशाला गवसणी घालत पाय घटत जमिनीवर रोवून ठेवत समाजाशी असलेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपला वावर अखेरपर्यंत कायम ठेवला. याच भावानेतून त्यांनी ‘मुकुल माधव फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर संशोधनाला वाव देण्यासाठी ‘होप फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर’ या प्रकल्पाची निर्मितीही केली. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आर्थिक गणिताचा विचार न करता रत्नागिरीसारख्या भागात शाळेची निर्मिती करतानाच उच्चशिक्षणासाठी जागतिक दर्जाची शैक्षणिक संकुले निर्माण केली. त्यात इंजिनिअरिंग इनि्स्टट्युशन फिनोलेक्स अॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीसह हिंजवडी येथील ‘इंटरनॅशनल आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ आदी समृद्ध ज्ञान शाखांचीही त्यांनी सुरुवात केली. आपला हा सारा प्रवासही त्यांनी समर्थपणे रेखाटत आदर्शाचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले ते 'देअर्स नो सच थिंग अॅज अ सेल्फमेड मॅन' नावाच्या आत्मचरित्रातून.


  
       प्रल्हादजींच्या कार्याने ‘सगुण फलनतः सज्जनां कुटुंबि’ या संस्कृत सुभाषिताची आठवण होते. कारण, सद्भावनेने सत्कार्य करणा-यांच्याच भाळी सत्काराचे येणारे भाग्य प्रल्हादजींच्या रूपाने चिरंतन प्रेरणा देत राहते. 
------------------------------

'दैनिक नवराष्ट्र'च्या दिनांक ८  मे २०१६ च्या अंकात 
प्रल्हादजी छाब्रिया यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा 
हा माझा लेख... 






#pralhadchhabriya #finolex #navrashtr #pune #makeinindia