Thursday 4 January 2018

विद्यार्थी नेत्यांना अटक 
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न आहे…!



“नियोजित आणि पूर्व परवानगी असतानाही विनाकारण ‘छात्रभारती’च्या आम्हा कार्यकत्यांना करण्यात आलेली ही अटक म्हणजे घटनात्मक मूल्यांची विटंबना असून प्रशासनाचे हे कृत्य लोकशाही विरोधी आहे. संविधानिक मार्गाने होत असलेले हे अधिवेशन हाणून पाडण्याचा सरकारचा हा डाव असून त्याचा निषेध करीत या पुढेही विवेकाचा आवाज नेहमीच बुलंद करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
सचिन बनसोडे
अध्यक्ष, छात्रभारती, मुंबई विभाग.





फाईल फोटो : छात्रभारतीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष संदीप आखाडे यांची ची अटक 


‘छात्रभारती’ या राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, युवक आणि शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेच्या ३५ व्या वर्षपूर्ती निमित्य काल आणि आज दोन दिवस ‘अखिल भारतीय विद्यार्थी संमेलन’ आणि अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी दोन महिन्यांपूर्वीच रीतसर शासकीय परवानगीही काढण्यात आली होती. मुळात संविधानिक तत्वांच्या अंमलबजावणीच्या सकारात्मक आग्रहासाठी काम करणाऱ्या ‘छात्रभारती’ संघटनेचे हे अधिवेशन म्हणजे समकालीन वास्तवाचे चिकित्सक करून त्यावर ठाम भूमिका घेत उपयोजनाच्या मार्गाची मीमांसा करणारे ठरणार होते. पूर्वनियोजित, पूर्वसूचित आणि पूर्वपरवानगी असलेले हे अधिवेशन म्हणजे कोणत्याही प्रकारची कथित ‘पब्लिक मिटिंग’ नसून ‘छात्रभारती’च्या देशभरातील कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय वार्षीक अधिवेशन होते. त्यासाठी देशभरातील निवडक कार्यकर्त्यांची रीतसर नोंदणीही करण्यात आली होती. मुंबईच्या विले पार्ले परिसरातील ‘मिठीबाई महाविद्यालया’च्या ‘भाईदास सभागृहा’त आयोजित या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर आपले विचार विद्यार्थ्यांपुढे मांडणार होते. काल पासून सुरु झालेला हा अधिवेशन सोहळा अत्यंत शांततेने आणि संविधानिक पद्धतीने सुरु होता.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सत्रांमध्ये देशभरातील काही युवा व छात्रनेते उपस्थित राहून विद्यार्थी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार होते.  त्यात गुजरात विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, उमर खालिद, रिचा सिंग आदींची प्रमुख उपस्थिती असणार होती. अर्थातच हा कार्यक्रमही निमंत्रित विद्यार्थी कार्यकत्यांसाठीच होता. उपरोक्त म्हटल्या प्रमाणे या कार्यक्रमाची परवानगीही व्यवस्थेने आधीच दिली होती. मात्र, आज तथाकथित शांतता व सुव्यवस्थेचा हवाला देत पोलिस प्रशासनाने ‘छात्रभारती’च्या कार्यकर्त्यांना ऐन वेळी १४९ अंतर्गत नोटीस बजावत हा कार्यक्रम न घेण्याबाबत धमकावण्यात आले. मात्र, शांततेच्या मार्गाने आपला घटनात्मक अधिकार बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम स्थळी पोहचताच दडपशाहीचा दंडुका वापरात पोलिसांनी संघटनेचे अध्यक्ष दत्ता ढगे, कार्यकारी अध्यक्ष संदीप आखाडे, छात्रभारतीच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष विशाल कदम यांच्यासह अन्य कार्यकत्यांना अटक केली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले प्रदीप नरवाल व रिचा सिंग यांना देखील यावेळी अटक करण्यात आली. त्यानंतरही हे अटक सत्र न थांबता देशभरातून आलेल्या ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचीही धरपकड करून सुरुवातीला ‘जुहू पोलीस स्टेशन’ व नंतर अन्यत्र हलवण्यात आले. त्याबद्दल पत्रकारांकडून पोलीस प्रशासनास विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचे समाधान कारक उत्तर मिळू शकले नाही. 

खरे तर, पोलिसांना काही तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसत असेल तर त्यांनी पोलिस संरक्षण द्यायला हवे होते. मात्र, असे न करता या बेकायदेशीर कारवाई मधून शोषणाधिष्ट व्यवस्थेचा छुपा अजेंडाच अमलात आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे कार्यकत्यांची ही अटक म्हणजे भारतीय संविधानिक मूल्यांवर हल्ला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे मत अनेक विद्यार्थी, युवक व्यक्त करत आहेत.

**********


पूर्व प्रकाशित -

सदर लेख वजा वार्तांकन वृत्तांत दिनांक ४ जानेवारी २०१७ रोजी सुप्रसिद्ध 'ऍक्टिव्हिस्ट पोस्ट'वर प्रकाशित करण्यात आला. या लेखाची लिंक - https://marathi.activist-post.com/opinion-editorial/police-pickedstudents-sloganeeringcampaign/



    

No comments:

Post a Comment